सावधान..!! रात्र अन दिवसही वै-याचा आहे.. -एडवोकेट बिभीषण गदादे
सावधान..रात्र अन दिवसही वै-याचा आहे
आपल्याकडे एक म्हण आहे 'झालं-गेलं-गंगेला मिळालं' दारुडा जरी मेला तरी मेल्यावर 'कसा का होईना बरा होता बिचारा..' म्हणायचा रिवाज आहे. माणसाच्या मृत्युनंतर त्याच्याशी असणारं वैर संपायला हवं. काल परवा औरंगाबाद ला एक सभा झाली. सभेच्या वक्त्याने अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाचं डफड वाजवायला सुरू केलं. खिलजी हा मुसलमान होता की हिंदू होता माहीत नाही पन द्वेशाचं सरण मात्र आज ही धार्मिक राज'कारणाच्या मनात धुसमसत आहे हे स्पष्ट झालं. आणि मग हिंदू मिर्झाराजे जयसिंगाच्या आक्रमणावर कोणी का बोलू नये? हा प्रश्न वेगळा.
शरद पवारांनी जातीच्या आधारे द्वेश पसरवल्याचा आरोपही या सभेत झाला. जाती वरून द्वेश करणं चुकीचं असल्याचं ज्ञान वक्त्याने पाजळलं. बरोबर आहे 'जातीच्या आधारे द्वेश करणं चुकीचं आहेच.. माणसा-माणसात कशाला भेद करायचे, नाही का? ' पन माननिय वक्त्याने धर्म धर्मात भेद करण्यावर ब्र सुद्धा काढला नाही? नाही म्हणजे जातीच्या आधारे मतं मागणारे ,राजकारण करणारे शरद पवार दोषी तर मग धर्माच्या आधारे राजकारण करणारे सज्जन कसे? त्यावर वक्ता काहीच बोलला नाही. नेमकं अर्धवट मानवतेचं प्रदर्शन का केलं ते त्यांनाच माहीत. कदाचीत ब्राम्हणांवर पिढ्यानपीढ्या अन्याय झाला असावा.त्याचा काही इतिहास वैगेरे वक्त्याने सांगितला नाही हे बरें.. नाहीतर फसगत झाली असती..नाही का?
म्हणे 'ते भोंगा धार्मिक मुद्दा नाही तर सामाजिक मुद्दा आहे '.भोंगा धार्मिक मुद्दा नसल्याचा जावई शोध लावल्याने सामाजिक मुद्यांवर वक्त्याचा खुपच अभ्यास असल्याचं जाणवले. कारण या वक्त्याने भोंग्या सारख्या अति महत्वाच्या सामाजिक प्रश्नाचं सोल्यूशन म्हणजे हनुमान चालीसा असल्याचं सांगितलं. म्हणजे जणू 'डोळ्यात केर गेला की डोळ्यात अॅसीड टाकून केर बाहेर काढा' असा अस्पष्ट सल्लाच या महाशयांनी दिला. आता मुळात भोंगा बंद झाला काय अन राहिला काय, असही अल्लाला काय फरक पडतो ? कदाचीत अल्लाह ची सुद्धा भोंग्याची डिमांड नसावी कारण त्या काळात कुठे भोंगे होते. त्यामुळे मुस्लिम नेत्यांनीही याचा विचार करायला हवा. आणि शहाण्या मुस्लिम बांधवांनी सुद्धा.
'लोकमान्य टिळकांनी शिवसमाधी बांधकाम केलं म्हणुन वक्त्याने सांगितलं पन टिळकांच्या आधी पहिल्यांदा मुळ समाधीस्थळाचा शोध घेतला तो म. फुलेंनी, आणि बदलापुरला झालेल्या शिवजयंतीला डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यक्षस्थानी होते, हे मात्र का सांगितलं नाही, ते त्यांनाच माहीत. कदाचीत ते म. फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे ब्राम्हण नव्हते म्हणुन नसेल सांगितलं. वक्ता फक्त पुरंदरेचा इतिहास वाचतो ,इतर लेखक भ्रष्ट आहेत का? पन वक्ता कुठे जातिवाद करतो!! वक्त्याच्या म्हणण्यानुसार जातीवाद तर शरद पवार करतात.आता काही दिवसापुर्वी याच वक्त्याने शरद पवारांना महाराष्ट्राच्या विकासाचे श्रेय दिलं होतं. हे कसं विसरता यईल. असो. वक्त्याने मध्येच जेम्स लेनची पूर्वनियोजित मुलाखतच दाखवली. त्यात बाबासाहेब पुरंदरेचा बचाव केला. आता बाबासाहेब पुरंदरे यांचा बचाव करण्याचं कारण काय ते अजून समजलं नाही. कारण वक्ता जातीवाद करत नाही. समर्थ रामदास नावाचे संत ही त्यांना प्रिय वाटले.तुकाराम महाराजांचा काळ १६०८ ते १६५१ चा, शिवरायांची स्वराज्य राजमुद्रा १६४६ ची, तर रामदासी पंथाची स्थापना १६४९ ची हे मात्र माननिय वक्त्यांनी सांगितलं नाही. वक्ते जातीवाद करत नाहीत नं म्हणुन!
'मी ब्राम्हणांची बाजू घ्यायला आलो नाही' अशी सफाई करायला वक्ते विसरले नाहीत. शेवटी पुण्यातील शंभर ब्राम्हणाचे आशिर्वाद घेऊनच ते औरंगाबादला आले होते हे सांगायचं मात्र विसरले. आशिर्वाद घेऊनही गाड्यांच्या ताफ्याला अपघात कसा होतो? यावर मात्र वक्ते बोलले नाहीत.
वरची बरीच पात्रे आज हयात नाहीत. पन तरी आजही आमच्या समाजाला जाती धर्मावरून विभागण्याचं काम होत आहे, हेच खरे. शेवटी जात तुमची जात नाही आन आमची जगू देत नाही. जात जात नाही अन अक्कल कधीच जातीवाद्यांना येत नाही. ते सतत इतरांना जातिवादी म्हणतात कारण त्यांना स्वतःला जातिवादी नसल्याचं सर्टीफिकेट हवं असतं. ते इतरांकडे बोट दाखवतात पन उरलेली चार बोटं स्वताकडे वळलेली असतात हेच ते विसरतात. ते एजंटच असतात पन स्वता कंपनी असल्याचा आव आणतात. पेरायचं तर विषच असतं पन त्याला हे लोक 'धर्म' नाव देतात... मग ते कट्टर हिंदू असो की कट्टर मुसलमान. मरणाचं सरण तर कधीच जळून जातं..द्वेशाची काजळी काही घर सोडत नाही. कधी भिंतीवर तर कधी आड्याला चिकटून राहते ...आणि काही धर्मांध त्यालाच 'धर्म' मानतात. तुम्ही मात्र , "सावधान..रात्र अन दिवसही वै-याचा आहे"
______________
एडवोकेट. बिभीषण गदादे
सं-7709313435
दि. 3/5/2022

अतिशय अभ्यासपूर्ण विचारांची मांडणी वकील साहेब👍☺️💐💐
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
हटवाSalute Saheb (SUJIT BACHATE)
उत्तर द्याहटवाधन्यवाद सुजितजी
हटवा